इतिहासाच्या पानांतील महान व्यक्तीरेखा पडद्यावर साकारण्याची संधी काहीच कलाकारांना मिळते. या परंपरेला पुढे नेत, अभिनेता अजिंक्य राऊत पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एका ऐतिहासिक व्यक्तीरेखेत प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे.
आगामी चित्रपट ‘अभंग तुकाराम’ मध्ये तो तरुण छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे. दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी दिग्दर्शन केलेला हा चित्रपट प्रेक्षकांना ७ नोव्हेंबरपासून पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचे सादरीकरण पॅनोरमा स्टुडिओज करत आहे, तर निर्मितीची जबाबदारी कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक, अजय अशोक पूरकर आणि दिग्पाल लांजेकर यांनी सांभाळली आहे. सहनिर्माते आहेत मुरलीधर छतवानी आणि रवींद्र औटी.
अजिंक्य राऊतने पूर्वीही विविध मालिका आणि सिनेमांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केले असून, त्याला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम लाभले आहे. या ऐतिहासिक भूमिकेविषयी बोलताना अजिंक्य म्हणाला:
“छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारण्याची संधी मिळणे हे माझ्यासाठी अपार सौभाग्य आहे. ही भूमिका निभावताना जबाबदारीची जाणीव ठेवावी लागते आणि संपूर्ण टीमने मला उत्कृष्ट सहकार्य केले आहे.”
चित्रपटाची कथा आणि संवाद प्रसिद्ध लेखक योगेश सोमण यांचे असून, दिग्पाल लांजेकर यांनी पटकथा आणि दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली आहे. चित्रपटाचे छायांकन संदीप शिंदे यांचे आहे. संकलन सागर शिंदे, विनय शिंदे यांचे आहे. रंगभूषा अतुल मस्के तर वेशभूषा सौरभ कांबळे यांची आहे. संगीत संयोजन आणि पार्श्वसंगीताची जबाबदारी मयूर राऊत यांनी सांभाळली आहे. ध्वनी आरेखन निखिल लांजेकर, हिमांशू आंबेकर यांचे आहे. साहसदृश्ये बब्बू खन्ना यांची आहेत. नृत्यदिग्दर्शन सुमित साळुंखे तर कलादिग्दर्शन प्रतीक रेडीज, संजय करोले यांचे आहे. निर्मिती पश्चात प्रक्रिया सचिन भिल्लारे यांची आहे. व्ही एफ. एक्स ची जबाबदारी शॉक अँड ऑ फिल्म्स यांनी तर व्हिजुअल प्रमोशनची जबाबदारी कॅटलिस्ट क्रिएटस यांनी सांभाळली आहे. सिनेमन एंटरटेनमेंटचे जय गोटेचा मार्केटिंग डायरेक्टर आहेत. कार्यकारी निर्मात्या केतकी गद्रे अभ्यंकर आहेत.
‘अभंग तुकाराम’ हा चित्रपट इतिहास आणि अध्यात्माचा अद्भुत संगम प्रेक्षकांसमोर आणणारा असून या चित्रपटातून अभिनेता अजिंक्य राऊतची एक वेगळीच प्रतिभा प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे.







