स्टार प्रवाहच्या आगामी ‘जय भवानी जय शिवाजी’ मालिकेत दिसणार सुप्रसिद्ध ताऱ्यांची फौज

Jai Bhavani Jai Shivaji

भूषण प्रधान साकारणार छत्रपती शिवाजी महाराज तर सुप्रसिद्ध अभिनेते अजिंक्य देव दिसणार बाजीप्रभू देशपांडेंच्या भूमिकेत

स्टार प्रवाह वाहिनीवर लवकरच सुरू होणाऱ्या ‘जय भवानी जय शिवाजी’ या मालिकेची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे नाव जरी उच्चारलं तरी उर अभिमानाने भरुन येतो. रयतेचा राजा कसा असावा याचा पायंडा शिवरायांनी रचला आणि या जाणत्या राजाच्या स्वराज्य स्थापनेच्या स्वप्नपूर्ततेसाठी हजारो शिलेदारांनी जीव ओवाळून टाकला. याच शिलेदारांच्या शौर्याची गोष्ट सांगणारी ‘जय भवानी जय शिवाजी’ मालिका २६ जुलैपासून रात्री १० वाजता स्टार प्रवाहवर सुरु होत आहे. नेतोजी पालकर, बाजीप्रभू देशपांडे, शिवा काशिद, जीवा महाला, तानाजी मालुसरे, कान्होजी जेधे, प्रतापराव गुजर, हंबीरराव मोहिते, मुरारबाजी देशपांडे, कोंढाजी फर्जंद या शूरवीरांची नावं आपल्याला परिचित आहेत. ‘जय भवानी जय शिवाजी’ ही मालिका या लवढय्यांच्या शौर्याला अर्पण असेल. अभिनेता भुषण प्रधान या मालिकेत छत्रपती शिवरायांची भूमिका साकारणार असून सुप्रसिद्ध अभिनेते अजिंक्य देव बाजीप्रभू देशपांडेंच्या भुमिकेत दिसतील. तर अभिनेता कश्यप परुळेकर नेतोजी पालकरांची भूमिका साकारणार आहे.

या मालिकेविषयी विषयी सांगताना भूषण प्रधान म्हणाले, ‘छत्रपती शिवाजी महाराज साकारणं हे प्रत्येक अभिनेत्याचं स्वप्न असतं. माझं देखिल स्वप्न पूर्ण होत आहे. मी बऱ्याच वर्षांपासून वाट पहात होतो की आपल्याला कधी महाराजांची भूमिका साकारायला मिळेल. जबाबदारीचं भान नक्कीच आहे. त्यामुळे उत्सुकता आणि धाकधुक दोन्ही वाढली आहे. ही जबाबदारी पूर्ण करण्यासाठी माझ्यसोबतच संपूर्ण टीम मेहनत घेते आहे.’

बाजीप्रभू देशपांडेंची व्यक्तिरेखा साकारण्यासाठी अभिनेते अजिंक्य देवही खुपच उत्सुक आहेत. ‘माझ्या करिअरची सुरुवातच सर्जा सिनेमातल्या ऐतिहासिक व्यक्तिरेखेने झाली होती. त्यामुळे बाजीप्रभू साकारताना प्रचंड आनंद होत आहे. बाजीप्रभूंच्या शौर्याच्या कथा आपण ऐकल्या आहेत, वाचल्या आहेत. पावनखिंडीमध्ये जीवाची बाजी लावत ते शेवटच्या श्वासापर्यंत लढले. अश्या या शूरवीराची भूमिका साकारायला मिळणं हे माझ्यासाठी नवं आव्हान असणार आहे. या भूमिकेसाठीचा लूकही माझ्यासाठी नवा आहे. फिटनेसच्या बाबतीत मी नेहमीच जागरूक असतो. व्यायाम आणि खाण्यावरचं नियंत्रण यामुळेच मी फिट आहे. मी दररोज पाच ते सहा किलोमीटर धावतो. उत्तम आरोग्यासाठी हे सर्व गरजेचं आहे असं मला वाटतं. या सगळ्याचा उपयोग मला ‘जय भवानी जय शिवाजी’ मालिकेत बाजीप्रभू साकारताना होतो आहे.

या भव्यदिव्य मालिकेविषयी सांगताना स्टार प्रवाहचे कार्यक्रम प्रमुख सतीश राजवाडे म्हणाले, ‘छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे अखंड महाराष्ट्राचच नव्हे तर आपल्या देशाचं आराध्य दैवत. महाराजांवर अनेक कथा, कादंबऱ्या, नाटक, मालिका आणि चित्रपट निर्माण झाले आहेत. यातून छत्रपती शिवाजी महाराजांची यशोगाथा आपण पाहिली आहे. ती वर्णावी तेवढी थोडीच आहे. आकाश ठेंगणं पडेल असे आपले छत्रपती शिवाजी महाराज. राजा असावा तर असा. या महान राजाच्या सेवेत अनेक रत्न होती ज्यांनी महाराजांच्या शब्दासाठी आपल्या देव देश आणि धर्मापायी प्राणांची आहुती दिली. अश्या शिलेदारांची गोष्ट सांगणारी मालिका ‘जय भवानी जय शिवाजी’ सादर करताना अभिमान वाटतो आहे. स्टार प्रवाह वाहिनी नेहमीच मातीशी निगडीत आणि रुतलेल्या सशक्त कथा सादर करण्याचा प्रयत्न करत असते. ही मालिका त्या सर्व शूर वीरांना अर्पण असेल. स्वराज्यासाठी लढलेल्या प्रत्येकालाच या मालिकेच्या निमित्ताने मानाचा मुजरा.’

स्टार प्रवाह प्रस्तुत या मालिकेची निर्मिती दशमी क्रिएशन्सची आहे. २६ जुलैपासून रात्री १० वाजता छत्रपती शिवरायांच्या शिलेदारांची ही गोष्ट भेटीला येणार आहे. तेव्हा पाहायला विसरु नका नवी मालिका ‘जय भवानी जय शिवाजी’ फक्त स्टार प्रवाहवर.

Jai Bhavani Jai Shivaji